चिंता आणि देवावर भिस्त
25 म्हणून मी तुम्हास सांगतो की, तुम्ही आपल्या जीवनाविषयी काळजी करु नका की आपण काय खावे आणि काय प्यावे किंवा आपल्या शरीराविषयी आपण काय पांघरावे अशी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा आणि शरीर वस्त्रांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे की नाही? 26 आकाशातील पक्ष्यांकडे पाहा! ती पेरीत नाहीत, कापणी करीत नाहीत किंवा कोठारात साठवूनही ठेवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात की नाही?
27 आणि चिंता करून आपले आयुष्याची लांबी हाथभरही वाढवणे तुम्हापैकी कोणाला शक्य आहे का? 28 आणि तुम्ही वस्त्रांविषयी का काळजी करता? रानातील फुलांविषयी विचार करा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत आणि ती कापड विणीत नाहीत, 29 तरी मी तुम्हास सांगतो की, शलमोन राजादेखील त्याच्या भर वैभवाच्या काळात यांतील एकासारखा ही सजला नव्हता. 30 तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, जी रानफुले आज अस्तित्वात आहेत आणि उद्या भट्टीत टाकली जातात त्यांना जर देव त्यांना असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तो तुम्हास घालणार नाही काय? 31 ‘आम्ही काय खावे’ किंवा ‘काय प्यावे’, अथवा ‘आम्ही काय पांघरावे’ असे म्हणून काळजीत करु नका.
32 कारण या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय करत असतात, कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हास या गोष्टींची गरज आहे हे ठाऊक आहे. 33 तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील.
34 म्हणून उद्याची चिंता करू नका कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्या स्वतः करेल. ज्या दिवसाचे जे दुःख ते त्या दिवसासाठी पुरेसे आहे.