1 "त्यावेळी स्वर्गाचे राज्य, आपआपले दिवे घेऊन वराला सामोर्या जाणार्या दहा कुमारींसारखे होईल. 2 त्यांच्यापैकी पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या. 3 मूर्ख कुमारींनी दिव्यांबरोबर आपले तेल घेतले नाही. 4 शहाण्यांनी मात्र दिव्यांबरोबरच आपआपल्या कुपीत तेलही घेतले. 5 वराला येण्यास उशीर लागला म्हणून सर्वांना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या.
6 "मध्यरात्री, ‘वर येत आहे; त्याच्या स्वागतासाठी बाहेर यावे!’ अशी हाक त्यांच्या कानी आली.
7 "मग सर्व कुमारी गडबडीने उठल्या आणि त्यांनी दिवे तयार केले. 8 मूर्ख कुमारी शहाण्या कुमारींना म्हणाल्या, ‘तुमच्या तेलामधून आम्हाला थोडे द्या; कारण आमचे दिवे विझू लागले आहेत.’
9 "त्यांनी उत्तर दिले, ‘नाही, ते तुम्हास व आम्हास पुरणार नाही. तुम्ही तेल विकणार्यांकडे जा आणि स्वतःसाठी विकत आणा.’
10 "त्या तेल विकत आणावयास गेल्या. वाटेत असतानाच, वर आला आणि ज्या कुमारी तयारीत होत्या, त्या वराबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या आणि दरवाजा बंद करण्यात आला.
11 "काही वेळाने त्या दुसर्याही कुमारी आल्या व म्हणू लागल्या, ‘प्रभू, प्रभू, आम्हासाठी दार उघडा!’
12 "पण वराने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला खरेच सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही.’
13 "म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तो दिवस व ती घटका तुम्हाला माहीत नाही.